Saturday, July 31, 2021

भारतीय ग्राहक आणि वितरण यंत्रणा

स्वदेशी आणि ‘पुनश्च हरिओम!’

लोकमान्य टिळकांनी स्वदेशीची हाक दिली त्याला आता शंभरहून अधिक वर्षे होऊन गेली. विशेष गोष्ट म्हणजे शतकानंतरही टिळकांनी सांगितलेला स्वदेशीचा विचार आजही तितकाच प्रासंगिक आहे. ही गोष्ट खरी आहे की टिळकांनी स्वदेशीची हाक दिली तो त्यांच्या इंग्रजांविरुद्धच्या लढाईचा एक टप्पा होता. आजच्या काळातला स्वदेशीचा आग्रह कोणाविरुद्ध नसून भारतीय उद्योजकांच्या आणि उद्यमशीलतेच्या समर्थनासाठी केलेला प्रयत्न आहे. चार महिन्यांपूर्वी, ज्याला सगळेजण ‘पीपीइ किट’ म्हणतात असे वैद्यकीय सुरक्षेसाठीचे कपडे भारतात बनत नव्हते. अवघ्या चार महिन्यातच असे कपडे (पीपीइ कव्हरऑल) बनवणारा जगातील महत्त्वाचा उत्पादक आपला देश ठरला आहे. हा केवळ एक उदाहरणार्थ उल्लेख आहे. भारतीय तंत्रज्ञांनी आणि उद्योजकांनी ठरवले तर ते काहीही करू शकतात याचा प्रत्यय यापूर्वीही अनेकदा आला आहे.

स्वदेशी उत्पादकांच्या प्रकारातला एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे स्थानिक स्तरावर चांगले उत्पादन करणारे छोटे उद्योजक. चांगल्या मार्केटिंग साखळीच्या अभावी गुणवत्ता चांगली असूनही अशी उत्पादने केवळ स्थानिक बाजारपेठेतच आपला ठसा उमटवतात असा आजवरचा अनुभव आहे. अशा छोट्या-छोट्या उत्पादकांसाठी मार्केटिंगची व विक्रीची आधुनिक तंत्रज्ञान वापरून एक व्यवस्था उभी करणे ही काळाची गरज आहे. अशा कुठल्याही प्रयत्नांना लोक भरभरून प्रतिसाद देतील अशी खात्री बाळगण्यासारखे आजचे चित्र आहे. सध्या सुरू असलेल्या कोविडच्या साथीमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत तर अनेकांना अर्ध रोजगार वा अल्प रोजगार मिळत आहे. स्थानिक ठिकाणच्या उत्पादन प्रक्रिया अधिक मजबूत झाल्या तर महाराष्ट्रा मध्ये स्थानिक ठिकाणी रोजगार निर्माण होण्याच्या संधीही वाढणार आहेत.

कोविडच्या साथीमुळे झालेला आणखी एक सकारात्मक बदल असा आहे की विदेशी उत्पादनांच्या पेक्षा चांगली देशी उत्पादने स्वीकारण्याकडे समाजाचा कल वाढला आहे. माननीय पंतप्रधानांनीही ‘आत्मनिर्भर भारत’ किंवा ‘Vocal for local’ असे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून ‘पीपीइ किट’ बनवणाऱ्या कंपन्या, औषधे बनवणाऱ्या कंपन्या, आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या, रोग प्रतिबंधक लस बनवणाऱ्या कंपन्या अशा विविध कंपन्या भारतीय उत्पादनांसाठी वेगाने पुढे आल्या आहेत, येत आहेत. एक समाज म्हणून आता आपली जबाबदारी अशी आहे की स्थानिक ठिकाणी निर्मिती होणाऱ्या आणि चांगली गुणवत्ता असणाऱ्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळायला हवा.

कोविडच्या साथीमुळे अन्नपदार्थ, दूध-दुभते, किराणा, भाजीपाला, औषधे अशा रोज लागणाऱ्या गोष्टींची घरपोच सेवा मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजारपेठेत जाऊन अनावश्यक गर्दी करण्यापेक्षा आणि जंतुसंसर्ग होण्याची ची शक्यता वाढण्यापेक्षा अशा वस्तू थेट घरी मागवण्याचा पर्याय लोक स्वीकारत आहेत. अशा प्रकारे घरपोच वस्तू पोहोचवण्याच्या मार्केटिंग साखळीमध्ये स्थानिक आणि छोट्या उत्पादकांचा अधिकाधिक सहभाग वाढणे ही काळाची गरज आहे. असा कुठलाही प्रयत्न विकासाची फळे अगदी शेवटच्या तालुक्या पर्यंत... शेवटच्या गावापर्यंत पोचवण्यात आपला महत्त्वाचा वाटा उचलणार आहे.

महाराष्ट्रात ‘स्टार युथ इंडिया- भारत कॅन्टीन’ ह्या बचत गट ते व्यवसाय उपक्रमाच्या माध्यमातून वरील विचारांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करत आहोत. कोविडची साथ हे जसे वैद्यकीय संकट आहे तसे ते आर्थिक संकट देखील आहे. स्थानिक उत्पादक आपापल्या छोट्या स्तरावर रोजगार निर्मितीचा प्रयत्न करत आहेत. अशा सर्व उत्पादनांना, उत्पादकांना आणि प्रयत्नांना लोकांसमोर आणणे व त्या माध्यमातून चांगली स्थानिक उत्पादने व अशा उत्पादनांना स्वीकारण्याची मनोमन तयारी असणारा महाराष्ट्रभर पसरलेला ग्राहक ह्यांच्यामध्ये एक स्मार्ट-दुवा म्हणून आपण काम करणार आहोत. आपण एक उत्तम ग्राहक गट तयार करून गटातील ग्राहकांना सर्व उपलब्ध वस्तू कमीत कमी पैशात उपलब्ध व्हावा अशी Supply Ststem विकसित करत आहोत. यासाठी आपण सर्वांना एकत्रित येणे आवश्यक आहे.
आज लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीच्या दिवशी आपण स्वीकारलेले हे काम अत्युत्तम आणि उत्तुंग करण्याचा संकल्प करुया. शतकापूर्वी ह्या महाराष्ट्राच्या मातीत ‘स्वदेशी’ ह्या मंत्राचा उच्चार करणाऱ्या लोकमान्य टिळकांना हीच सक्रीय आदरांजली ठरेल.

1 comment:

  1. सुरुवात करणे फार महत्त्वाचे आहे. आणि सुरुवात झाली आहे.

    ReplyDelete